शिंदे – भाजपा सरकारला लाखो तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा अभिमान वाटतो का?

पुणे दि.१९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची, नगरपरिषदेची आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) परीक्षा ही २९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षा देण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आशा – आकांक्षाशी खेळणे आणि त्यांना एका चांगल्या भविष्यापासून वंचित ठेवणे हा भाजप सरकारचा नवा छंद असल्याचे दिसते. या शिवाय दुसरे काय कारण असू शकेल? एकाच दिवशी होणाऱ्या ३ महत्वाच्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पर्याय मर्यादित होणार नाहीत, तर आधीच रोजगाराच्या फार कमी उपलब्ध असलेल्या संधीमुळे त्या मर्यादित होणार आहे.
विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांचा परिक्षेच्या तयारीसाठीचा मौल्यवान वेळ वाया जाणार आहे. आधी सार्वजनिक क्षेत्रातील नोकरांचे खाजगीकरण केले आणि आता हे! एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांना माझा प्रश्न आहे की, लाखो तरुणांचे भविष्य उद्ववस्त करू पाहणाऱ्या तुमच्या धोरणाचा तुम्हाला अभिमान वाटतो का ?” असा सवाल त्यांनी ट्विटरवरून विचारला आहे.
पोलिस उपनिरीक्षक परिक्षेसाठी , नगरपरिषदेच्या परीक्षेसाठी आणि महाज्योतीच्या परिक्षेसाठी बहुतांश सारखेच विद्यार्थी तयारी करत असतात मात्र, या तिन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे देखील पेच निर्माण झाला आहे. वेळापत्रकात बदल न केल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो असे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – भाजपा या दोघांवर टीका केली आहे.
ML/KA/SL
19 Oct. 2023