शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

 शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन


मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
राज्य सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ४९५ डी.एड. आणि बी.एड. शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. प्रखर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे.
संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते म्हणाले, “२३ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय पुनर्जीवित करून आम्हाला न्याय द्यावा.” २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. पदवीधर बेरोजगार शिक्षकांना मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र, ३० एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषदेने त्यांना कार्यमुक्त केल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेसातशे शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाल्याने शेकडो प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत. “शाळांचे दरवाजे उघडण्यासाठी देखील शिक्षक मिळत नाहीत,” अशी खंत संजय कुळीये, अजिंक्य पावसकर, गिरीश जाधव आणि मृदुला देसाई यांनी व्यक्त केली.

सुदर्शन मोहिते यांनी स्पष्ट केले की, “तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अव्यवहारी निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षण समतोल बिघडला आहे.”
या आंदोलनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

ML/ML/PGB 17 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *