राष्ट्रवादीची वर्धापनदिनाची जाहीर सभा पुढे ढकलली

मुंबई दि. ६ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जूनला (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सगळ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान होत आहे. यावर सरकारने मदत करा अशा फक्त स्टँडींग ऑर्डर दिल्या आहेत. परंतु मदत होत नाहीये किंवा शेतकऱ्यांना मदत मिळालेली पहायला मिळाली नाही. सरकारने एक हजार ८० कोटी रुपये कारखान्यांना मंजूर केले होते परंतु त्यातून कॅबिनेटने फक्त पाच कारखान्यांना साडे पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे यांचा संबंधित कारखाना, हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कारखान्यांना ही मदत जाहीर केली आहे. बाकीच्या कारखान्यांना मात्र राजकीय नजरेने बघून चालत नसते परंतू हे सरकार ‘हम करेसो कायदा’ या पध्दतीने काम करत आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला. टोमॅटो, कांदा, कापूस यांचे भाव पडल्याने विशेषतः नाशिकमधील कांदा व टोमॅटो पिकवणारा शेतकरी उत्पादक हवालदिल झाला आहे. त्यांना हा भाव अजिबात परवडत नाहीय. अधिवेशन काळात सभागृहात अनुदान देण्याबाबत जो निर्णय झाला त्या निर्णयाचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोचले नाहीत. मध्यंतरी कापसाचे भाव चांगले झाल्याने विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवला कारण अजून भाव वाढेल म्हणून शेतकऱ्यांना अपेक्षा असते भाव वाढले तर कुटुंबाला मदत होऊन आर्थिक घडी नीट बसेल. परंतु आता वाढलेले भाव कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कापूस केंद्रे शेतकऱ्यांना कापसाचा भाव पाडून मागत आहेत. मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी जोरदार टीकाही अजित पवार यांनी केली.
ML/KA/PGB 6 Jun 2023