वर्गमित्र आजारी, विद्यार्थ्यांची आगीनगाडी आली दारी

 वर्गमित्र आजारी, विद्यार्थ्यांची आगीनगाडी आली दारी

यवतमाळ, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांची गैरहजेरी ही कोणत्याही शाळेतील एक नेहमीची समस्या. यामध्ये विद्यार्थी आजारी पडणे एक प्रमुख कारण असते.त्यातही शाळा जर ग्रामीण भागातील असेल तर मग विचारायलाच नको. अशा गैरहजर राहण्याच्या समस्येवर अतिशय कल्पक मार्ग काढला आहे तो यवतमाळ जिल्हयातील कळंब तालुक्यातील सुकळी येथील एका शिक्षकाने. या शिक्षकाचे नाव आहे संदिप कोल्हे.

कळंब पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत संदिप कोल्हे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. या शाळेत पहिली ते 5 वी पर्यंतचे जवळपास 150 विद्यार्थी पटावर आहेत. यापैकी कोणता विद्यार्थी आजारी पडला असेल, तर शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची आगगाडी केली जाते. अर्थातच हा एक बालपणीचा खेळ आहे. साहजिकच या आगगाडीत सहभागी व्हायला बालसुलभ विद्यार्थ्यांना आवडते.

ही आगगाडी संबधित आजारी विद्यार्थ्याच्या घरी जाते.यावेळी ‘‘झुकझुक ही आगीनगाडी… सरळ रेषेत मुले ही चाली….पळत आपण जावुया…मित्राला शाळेत आणुया’’..! हे बालगीत गात ही आगीनगाडी आजारी विद्यार्थ्याच्या घरी पोहचते. ही मंडळी तेथे गेल्यावर त्याच्यासोबत गप्पागोष्टी करतात. त्याची विचारपुस करतात. आणि शाळेत येण्याचा आग्रह धरतात. त्याला खाऊ देतात.

साहजिकच याचा त्या विद्यार्थ्याच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो, त्याचा आजार दूर पळून जातो. लागलीच तो शाळेत यायला तयार होतो. खरंतर आजकाल धकाधकीच्या जीवनात, त्यातही मोबाईलच्या युगात प्रत्यक्षात भेटीगाठी दुर्मिळ झाल्या आहेत.प्रत्यक्षात मित्रांच्या, नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या तर मनावरील ताण नाहीसा होतो. मन प्रसन्न होते.

त्यातच जर कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीची भेट घेऊन जर विचारपूस केली तर चा व्यक्तीला निश्चितच बरं वाटू लागतं.हाच धागा पकडून संदिप कोल्हे यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे यात शंकाच नाही. या अनोख्या उपक्रमाचं विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

ML/KA/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *