सावित्रीबाई फुले जयंती : स्त्री शिक्षणातून खऱ्या अर्थाने स्त्रीला कणखर करणारी दुर्गा

मुंबई, दि. 3 (राधिका अघोर) : मुलींना शिक्षणाची दारं खुली करून देत, त्यांना शिक्षण घेण्याची, स्वावलंबी होण्याची ताकद आणि हिंमत देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज 194 वी जयंती. भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण हा त्यांचा अत्यंत अल्प परिचय आहे. ज्या काळात जोतिबा आणि सावित्रीबाई यांनी आपलं समाजसुधारणेचं कार्य पुढे नेलं, तो काळ म्हणजे १८३१ ते १८९७ हा अत्यंत कर्मठ, रूढीप्रथा मानणारा काळ होता. महाराष्ट्राच्या सुधारणावादी प्रेरणांना जणू ग्लानी आली होती. शिक्षण केवळ एकाच वर्गाची मक्तेदारी होती. अंधश्रद्धा प्रचंड वाढत होत्या. आणि समाज जेव्हा अशा मागास अवस्थेत असतो, त्यावेळी, त्याचा सर्वात जास्त फटका दुर्बल घटकांना बसतो. याच दुर्बल घटकांना फुले दांपत्याने आधार दिला.
आपले पती महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि जोतिबा हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. त्या काळात, अर्थातच, ह्या शाळेचं स्वागत झालं नाही. उलट,
धर्म बुडाला असं सांगत, कर्मठ सनातन्यांनी फुले दाम्पत्याला विरोध केला, अंगावर शेणही फेकले. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाचा वसा त्यांनी पुढे सुरूच ठेवला. आज आपण ज्या मुक्त वातावरणात प्रगतीची शिखरं गाठतो आहोत, त्याचा पाया रचताना सावित्रीबाईंनी अनेक वेदना झेलल्या.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि स्त्री पुरुष भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता.
पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.
विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. ही सेवा करतांना, सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन आणि महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. स्त्री शिक्षणातून खऱ्या अर्थाने मुलींना सक्षम आणि कणखर बनवणाऱ्या ह्या दुर्गेचे आशीर्वाद कायम स्वरुपी महाराष्ट्रातल्या लेकींच्या पाठीशी आहेत.
ML/ML/PGB 3 Jan 2025