स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे पाठपुरावा
मुंबई दि ५ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताबाने गौरवावे अशी मागणी यापूर्वी राज्य सरकारने दोन वेळा केंद्र सरकारकडे केली आहे , त्याचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही राजशिष्टाचार खात्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली, सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीसाठी मांडलेल्या अशासकीय ठरावावर ते उत्तर देत होते.
२०१८ आणि २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केंद्राला विनंती केली होती. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन या मागणीसाठी शासन म्हणून याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. राजशिष्टाचार मंत्री म्हणून मी स्वतः याबाबत पाठपुरावा करेन. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली.
याआधी बोलताना मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासंदर्भातील ठराव याच अधिवेशनात संमत करावा आणि तो केंद्र सरकारला पाठवून द्यावा. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आमदारांना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन, याबाबत आग्रह धरावा अशी मागणी हा ठराव मांडताना केली होती, सरकारच्या आश्वासनानंतर मुनगंटीवार यांनी आपला ठराव मागे घेतला.ML/ML/MS