सरकार आणि जनता यातील दूरी कमी करणे हेच उद्दिष्ट

कुडाळ, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):सरकार आणि जनता यांच्यातील दूरी दूर करण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना आहे . या माध्यमातून शासन जनतेच्या दारापर्यंत पोहोचते आहे आणि खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ जनतेला मिळतो आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आयोजित शासन आपल्या दारी महासंकल्प या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .”माका गर्दी बघून आनंद झालो” अशा मालवणी भाषेत सुरुवात करत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच सिंधुदुर्गवासियांची मने जिंकली . कार्यक्रमाला झालेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग वासियांनी गर्दीचा उच्चांक मोडला अशी शाबासकी दिली . या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , उद्योग मंत्री उदय सामंत ,
पालकमंत्री रवींद्र चव्हाण , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , आमदार भरत गोगावले , आमदार नितेश राणे ,आमदार रवींद्र पाठक , माजी खासदार निलेश राणे आधी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जिल्हावासियांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना गोमय गणेश मूर्ती देत त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांनी एकत्रित कळ दाबून शासन आपल्या दारी या योजनेचा सिंधुदुर्गातील शुभारंभ केला . यानंतर पाच लाभार्थ्यांना प्रतिनिधी चेक देऊन शुभारंभ झाल्याचे जाहीर केले.
ML/KA/PGB 6 Jun 2023