साहित्य संमेलन राजकीय नाही मात्र नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य अनावश्यक

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत पार पडलेले 98 वे मराठी साहित्य संमेलन म्हणजे राजकीय व्यासपीठ होते अशा पद्धतीचा आरोप मला अमान्य आहे, तरीही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका परिसंवादात व्यक्त केलेले वक्तव्य अनावश्यक होते असे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नीलम गोऱ्हे या अनेक पक्ष फिरून आता शिवसेनेत आलेल्या आहेत, त्यांनी चार वेळा विधान परिषदेची उमेदवारी मिळवताना नेमके काय केले याची कल्पना सगळ्यांनाच आहे, त्यामुळे त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय उल्लेख करणे अनावश्यक होते असे शरद पवार यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी मांडलेले मत योग्य असून स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्यावर काही आरोप केले असतील तर त्यावर आपल्याला काही बोलायचे नाही असेही पवार यांनी यावेळी सांगितले. कालच पार पडलेल्या साहित्य संमेलनात राजकीय व्यक्तींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता असा होत असलेला आरोप आपल्याला अमान्य असून कार्यक्रम पत्रिका पाहिल्यास याबाबतचा पूर्ण अंदाज येऊ शकतो असेही ते म्हणाले.
ML/ML/SL
24 Feb. 2025