पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी १ हजार ६०० कोटी रु. मंजूर

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या पाणी वापर कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी १ हजार ६०० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, तसेच शेतकऱ्यांची उत्पादकता वाढून सिंचनाची व्यवस्था अधिक शाश्वत पद्धतीने अंमलात येईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. तसेच योजनेचे पायलट प्रोजेक्ट विविध जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहेत. या पायलट प्रोजेक्टनंतर केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट योजनेला एप्रिल २०२६ पासून राबवण्यास सुरुवात करेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी दिली आहे.
प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. अश्विनी म्हणाले, “नव्याने मंजूर झालेल्या योजनेत सिंचन पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामधून कालवे किंवा अन्य सिंचन स्त्रोतापासून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आहे,” असा दावाही वैष्णव यांनी केला आहे.
तसेच सिंचन प्रणालीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते पुढे म्हणाले, “सूक्ष्म सिंचन प्रणालीसाठी विशेषतः दाबयुक्त भूमिगत पाईपलाईन वापरुन, मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.” असंही वैष्णव यांनी प्रतिपादन केलं.
सिंचन प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी रिअल टाइम वॉटर अकाऊंटींग मॅनेजमेंट आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून पाणी वापर क्षमता सुधारता येणार आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं.
SL/ML/SL
9 April 2025