आळंदीतील सर्व वारकरी शिक्षणसंस्था बंद करण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा ठराव

 आळंदीतील सर्व वारकरी शिक्षणसंस्था बंद करण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा ठराव

आळंदी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीमध्ये लाखो भाविक दरवर्षी नित्यनेमाने येतात. या भूमीचे पावित्र्य ओळखून आध्यात्मिक शिक्षणासोबत शालेय शिक्षणाची जोड देत अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्था उदयास आल्या. राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी आळंदीत अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. या संस्थांमध्ये कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २०० विद्यार्थी असतात. मुले आणि मुलींच्या काही एकत्र तर काही वेगवेगळ्या शाळा आहेत. यांपैकी काही शाळांमध्ये मुलांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाची व तीर्थक्षेत्र आळंदीची बदनामी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या, असा एकमुखी ठराव मंजूर केला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये आळंदीतील काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावर पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली आहे. या प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे. तर काही जण शिक्षा भोगत आहेत. परंतु या घटनेनंतर अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असे आळंदीकरांना वाटत होते. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचे नाव बदनाम होत आहे.या घटनांचा तीव्र निषेध करण्यासाठी नुकतीच आळंदीकर ग्रामस्थांची ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी आळंदी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन देखील आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने रात्री उशिरापर्यंत करण्यात आले.

SL/ML/SL

12 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *