मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील वस्त्या पाण्याखाली
चंद्रपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पहाटेपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील इरई धरण 80 टक्के भरल्याने चार दरवाजाच्या माध्यमातून 200 कुसेक्स मीटर नी पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे.
वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने चंद्रपूर – राजुरा, घुगुस – चंद्रपूर, वरोरा – वणी – यवतमाळ मार्ग बंद झाला आहे.इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. आज पहाटे अडीच वाजतापासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.
अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामानांची मोठ्या प्रमणात नासधूस झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. तसेच जलनगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, वडगाव, नगिनाबाग, रामनगर, बिनबा गेट, पठाणपुरा, नागपूर रोड, रहमत नगर, लखमापूर, अंचलेश्वर गेट या भागात अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले आहे.
पठानपुरा गेटच्या बाहेर पाणी आल्याने राजनगर, सहारा कॉलनी पाण्याखाली आहे. तेथील लोकांना इतरत्र हलविण्याचे काम सुरू आहे. नदीकाठावरील रहमतनगर या खोलगट भागातील वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील लोकांना इतरत्र हलविण्याचे काम सुरू आहे.
ML/KA/SL
28 July 2023