रोहिंग्या मुस्लिम हटाव, हाच मुंबई महापालिका जिंकण्याचा प्लॅन..!

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विमर्श ग्रुपने जबरदस्त व्यूहरचना केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊन बांगलादेशी रोहिंग्याना हाकलून लावण्याची मोहीम सुरू करणे, हा भाजपच्या मुंबई महापालिका निवडणूक रणनीतीचा मुख्य मुद्दा राहणार असल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती आहे.
भाजपच्या शिर्डी येथील महाविजय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार रा. स्वं. संघ आणि भाजपच्या मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक मुंबईत रविवारी पार पडली. या बैठकीत संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी या मंत्र्यांना मार्गदर्शन केले. पंचायत ते पार्लमेंटपर्यंत बहुमताने सत्ता हस्तगत करणे, हेच संघ आणि भाजपचे लक्ष्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक होऊन जनतेच्या स्थानिक प्रश्नांना अधिकाधिक चालना देण्याचा सल्ला लिमये यांनी मंत्र्यांना दिल्याची माहिती खास सूत्रांनी दिली.
महायुती सरकारमध्ये भाजपकडे गृह महसूल, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, वने, पर्यावरण , वातावरणीय बदल, पशुसंवर्धन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता , नाविन्यता, पणन आणि इतर मागास बहुजन कल्याण, कामगार यासारखी महत्त्वपूर्ण खाती आहेत. या खात्यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे कशी पोहचवता येईल, याबाबत लिमये यांनी मंत्र्यांना प्रशिक्षण दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधून प्रचार केला. त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधणे आवश्यक आहे, असे बैठकीत सांगण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर मुंबईत भाजप आक्रमक
शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असलेली मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी मुंबईत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांची हकालपट्टी करण्याची मोहीम भाजपकडून राबविली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच भाजपच्या मंत्री आणि आमदारांना जनतेमध्ये जाऊन आपली प्रतिमा सुधारण्याचा कानमंत्र दिला होता. रा. स्व. संघाच्या तज्ञांनी मंत्र्यांच्या बैठकीत हाच उपदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
ML/ML/SL
20 Jan. 2025