Reliance Jio कडून मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपूर्वी इंटरनेट सेवेचे दर वाढवल्यामुळे ट्रोल झालेली Reliance Jio आता ग्राहकांना खूश करण्याता प्रयत्न करत आहे. Reliance Jio मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देणार आहे, याची माहिती कंपनीनं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या नेटवर्कमध्ये बिघाड आला होता, त्यामुळे मुंबईत कॉलिंगसह इंटरनेट पर्यंत सर्व सेवा काही काळ बंद पडल्या होत्या. मंगळवारी नेमका काय प्रकार घडला हे मात्र जिओनं सांगितलं नाही, परंतु नेटवर्क गेल्यामुळे ज्या ग्राहकांना त्रास झाला त्यांना दोन दिवसांचा कॉम्प्लिमेंटरी प्लॅन देण्याची घोषणा कंपनीनं केली आहे.
याआधी देखील अनेकदा अश्याप्रकारे जिओ नेटवर्क बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एक्स (ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिओ युजर्सनी आपला राग व्यक्त केला, ज्यात अलीकडेच करण्यात आलेल्या दरवाढीचा देखील उल्लेख पाहायला मिळाला. कंपनीनं त्वरित कारवाई केली आणि काही तासांमध्ये पुन्हा एकदा सेवा दुरुसत केली आणि आता ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देऊन नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
जिओने मेसेज मध्ये लिहलं आहे की, “ प्रिया जिओ युजर्स, तुम्हाला दर्जेदार सेवा देण्यास आम्ही प्राधान्य देतो. परंतु दुर्दैवाने मंगळवारी सकाळी सेवांमध्ये अडथळा आला. तुमच्या नंबरवर दोन दिवसांची अमर्याद प्लॅन निशुल्क लागू करण्यात आला आहे. हा निशुल्क प्लॅन लागू होताच आपोआप चालू होईल. तुम्हाला सेवेचा चांगला अनुभव येण्यास आम्ही प्राधान्य देतो. जिओकडून सप्रेम भेट.”
SL/ML/SL
20 Sept 2024