राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक
मुंबई, दि. १८ : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या १० राज्यांमधील ३७ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या जागा
महाराष्ट्रातून शरद पवार, डॉ. भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धर्यशील पाटील, रजनी पाटील, रामदास आठवले या ७ जागा रिक्त होणार आहेत. तर, अभिषेक सिंघवी (काँग्रेस), साकेत गोखले (TMC), एम थंबीदुराई (AIADMK) आणि तिरुची शिवा (DMK) अशा प्रमुख खासदारांच्या जागा देशभरातून रिक्त होणार आहेत.
राज्यनिहाय जागा
महाराष्ट्र (७ जागा), ओडिशा (४ जागा), तेलंगणा (२ जागा), तामिळनाडू (६ जागा), छत्तीसगड (२ जागा), पश्चिम बंगाल (५ जागा), आसाम (३ जागा), हरयाणा (२ जागा), हिमाचल प्रदेश (१ जागा) आणि बिहार (५ जागा) या राज्यातील जागा रिक्त होणार आहेत. या जागा २ एप्रिल आणि ९ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत.
निवडणुकीसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ मार्च अंतिम तारीख असेल. तर, ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि ९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील.