राज्यात पावसाने ओढ दिली, पेरण्या खोळंबल्या, विरोधकांनी केला सभात्याग

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नाही , पेरण्या केवळ वीस टक्के झाल्या आहेत , अनेक ठिकाणी बोगस बियाणे मिळतंय , सरकारचा वचकच राहिला नाही, दिल्लीत जाण्यात त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतेय , त्यावर तातडीने चर्चा करावी , असा स्थगन प्रस्ताव काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत मांडला.
अध्यक्षांनी त्याला अनुमती नाकारली म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले. विधानसभेत सभागृहाचे कामकाज वंदे मातरम् आणि राज्य गीताने सुरू झाले. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस सदस्य आक्रमक झाले होते , त्यांनी जागेवर उभे राहून घोषणा दिल्या. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्या , काही कागदपत्रे सादर करण्यात आली. याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला.
राज्य सरकारला या विषयाचे गांभीर्य आहे , गेल्या वर्षीच्या तुलनेत 80% पेरण्या झाल्या आहेत, पुण्यात आणि नाशिक विभागात पेरण्या कमी झाल्यात , आमचा तातडीच्या उपाययोजना तयार आहेत , आता पर्यंत दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान शेतकर्याला दिले आहे असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बोगस बियाणे आणि खते यासाठी सरकार नवा कायदा तयार करीत आहे , हे सगळं अत्यावश्यक कायद्याच्या कक्षेत घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं.
पुढील दोन तीन दिवसात चांगला पाऊस अपेक्षित आहे, मात्र नाही पडला तरी त्यासाठी काय उपाययोजना करायच्या त्याचा आराखडा तयार केला आहे. केवळ विरोधकांनाच शेतकऱ्यांची काळजी आहे असं नाही सरकारला ही आहे असे फडणवीस म्हणाले.
आज ४१,२४३ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर झाल्या. अध्यक्षांनी तालिका अध्यक्ष घोषित केले. त्यानंतर दिवंगत सदस्य गिरीष बापट, सुरेश उर्फ बाळू धानोरकर , शंकरराव वाकुळनिकर, बाबुराव वाघमारे आणि रामचंद्र अवसरे यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
ML/KA/SL
17 July 2023