उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जून महीना संपत आला तरी अद्याप नैऋत्य मौसमी पावसाने राज्यात जोर धरलेला नाही. क्वचित एखादी सर येऊन हवेत गारवा निर्माण होत असला तरी शेतीवर आधारित असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची स्थिती आहे. पेरण्या आटोपून बळीराजा आता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. राज्यातील धरणांनी तळ गाठला असून सामान्य नागरिक आणि प्रशासनही या लांबलेल्या पावसाने हवालदिल झाले आहेत. आज उद्या करत करत हवामान विभागाचे अंदाज चुकवणारा पाऊस अखेर उदयापासून राज्यभर जोर धरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील वातावरणात सतत बदल (Climete Change) होत आहे. काही भागात उन्हाचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, तज्ज्ञ देत आहे.