राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी…

बीड, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबाजोगाईसह जिल्ह्यातील काही भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.तर अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ४५ दिवसापासून पावसाने दडी मारली होती. यात सोयाबीन पिकासह अन्य पिके करपून गेलेली आहेत. तर जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे.
मात्र आज सकाळपासून बीड, अंबाजोगाई, परळी, केज,माजलगाव, वडवणी, आष्टी, पाटोदा परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. अंबाजोगाईच्या ग्रामीण भागात सकाळी ६.४५ वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले , मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा वाढण्याची चिन्हे आहेत. दिवसभर पडलेल्या पावसाने मुंबई महानगर परिसरातील गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला होता. ठिकठिकाणी पावसात भिजत दहीहंडी फोडण्याचा करताना गोविंदा दिसत होते.
पालघरमध्येही पाऊस
गेल्या महिनाभराच्या मोठ्या विश्रांती नंतर पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने काहीशी हजेरी लावली. आज सकाळपासून जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरात हवा तसा पाउस होत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले होते. कारण या काळात भात शेतीला पावसाची आवश्यकता होती.
मात्र भर पावसाळयात कडक ऊन तापत असल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत होता. आज काहीसा का होईना पण पाऊस अधून मधून झाल्यानं शेतक-यांच्या आशा वाढल्या आहेत.
धुळ्यातही पाऊस
तब्बल महिनाभराच्या अवकाशानंतर धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशीही पर्जन्यवृष्टी संपूर्ण जिल्ह्यात झाली. पर्जन्यवृष्टी शिरपूर, साक्री, पिंपळनेर , दोंडाईचा, धुळे तालुका तसेच धुळे शहरातही पावसाचे धडाकेबाज आगमन झाले असून दोन दिवसापासून पावसाने आपली हजेरी धुळे जिल्ह्यात नोंदवली आहे.
ML/KA/SL
7 Sept. 2023