१ जुलैपासून रेल्वे तिकिट दरात वाढ

मुंबई, दि. २४ : रेल्वेने दीर्घ कालावधीनंतर तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी हे निर्णय घेतले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. उपनगरीय तिकिटांसाठी आणि द्वितीय श्रेणीच्या ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी, ही वाढ प्रति किलोमीटर अर्धा पैसा असेल. याव्यतिरिक्त, मासिक हंगामी तिकिटात कोणतीही वाढ होणार नाही.
नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढणार आहे, तर एसी क्लासमध्ये 2 पैसे प्रति किलोमीटर भाडे वाढणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम होणार आहे. जर एखादा प्रवासी मुंबई ते दिल्ली (1400 किमी) नॉन-एसी ट्रेनने प्रवास करत असेल तर त्याला 14 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तर एसी क्लाससाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.
नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार भारतीय रेल्वेच्या अधिकृत बुकिंग एजंटसाठी तात्काल तिकिट आरक्षणावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून तात्काल रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. १० जून २०२५ रोजी जारी केलेल्या निर्देशाद्वारे, रेल्वे मंत्रालयाने सर्व रेल्वे झोनना कळवले आहे की ही नवीन आवश्यकता “तत्काळ योजनेचे फायदे सामान्य वापरकर्त्यांना मिळावेत याची खात्री करण्यासाठी” आहे.
रेल्वेच्या अधिकृत सूचनेत म्हटले आहे की “०१-०७-२०२५ पासून, तात्काल योजनेअंतर्गत तिकिटे फक्त आधार प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइट / त्यांच्या अॅपद्वारे बुक करता येतील.”
मंत्रालयाने असेही जाहीर केले आहे की १५ जुलै २०२५ पासून, प्रवाशांना तात्काल तिकिटे बुक करताना आधार-आधारित OTP प्रमाणीकरणाचा अतिरिक्त टप्पा पूर्ण करावा लागेल.