मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह
पालघर, दि. ९ : पालघरच्या किनारपट्टीवर प्रस्तावित ‘मुरबे मल्टिकार्गो बंदरा’च्या पर्यावरणीय परिणाम अहवालातील (EIA) गंभीर त्रुटी आता केंद्र सरकारच्या स्तरावर उघड झाल्या आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या केंद्र सरकारच्या तज्ज्ञ मूल्यमापन समितीच्या (EAC) ४३६ व्या बैठकीत या प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. समितीने प्रकल्पाच्या अहवालात तब्बल २० गंभीर त्रुटी नोंदवत प्रस्तावाला सध्या स्थगिती दिली आहे.
तज्ज्ञ समितीने नमूद केलेल्या निरीक्षणांनुसार या प्रकल्पात अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषतः तारापूर अणुशक्ती केंद्राच्या (TAPS) सुरक्षिततेचा प्रश्न, किनारपट्टीवरील वाढणारी धूप आणि स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेवर होणारा संभाव्य परिणाम यावर समितीने कडक ताशेरे ओढले आहेत. इतक्या संवेदनशील परिसरात प्रकल्प राबविताना जोखीम मोजण्यासाठी आवश्यक असलेले शास्त्रशुद्ध निकष का पाळले गेले नाहीत, असा सवालही समितीने प्रकल्प प्रवर्तकांना विचारला आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने या प्रकरणात केंद्र सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये चुकीची माहिती आणि बनावट नकाशे सादर केल्याबद्दल ‘EIA नोटिफिकेशन २००६’ च्या नियम ८(vi) अंतर्गत हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा. फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे JSW कंपनी व संबंधित सल्लागार संस्थेला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. कोऱ्या कागदपत्रांच्या आधारे झालेली जनसुनावणी अवैध ठरवून, सुधारित अहवाल किमान ३० दिवस आधी प्रसिद्ध करून नव्याने जनसुनावणी घ्यावी.तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या प्रक्रियेची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशी करावी. अशा मागण्यांचा समावेश आहे.