रत्नागिरीतील बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

 रत्नागिरीतील बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

रत्नागिरी, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात विविध खाणी आणि उत्खनन प्रकल्पांमधून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास सुरु आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात उत्खननामुळे समान्य लोकांच्या वाड्यावस्त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी – नाणार पाठोपाठ सागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध केला आहे.या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाणार, सागवे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेनंतर गणेशोत्सव तोंडावर असल्याचे कारण पुढे करत हा स्थगिती निर्णय जाहीर केला.याबाबत जिल्हाधिकारी लवकरच अहवाल देतील,असेही ते म्हणाले.आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाणार,सागवे, बारसू येथील ग्रामस्थांशी चर्चा केली.नाणार येथे २९ ऑगस्टला, तर सागवे येथे ५ सप्टेंबरला बॉक्साइट उत्खननाबाबत जनसुनावणी लावण्यात आली होती. मात्र कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू आहे. त्याच्या थोडाच काळ आधी ही जनसुनावणी का लावण्यात आली आहे, असा प्रश्न या ग्रामस्थांनी केला.त्यावेळी सणासुदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये,यासाठी ही जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे,असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना ही जनसुनावणी प्रस्तावित केली होती.आता याबाबत प्रांताधिकारी यांना अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. सण तसेच पश्चिम घाट हरित क्षेत्र या सर्व गोष्टींचा विचार करुन हा अहवाल तयार केला जाईल.ते आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी राज्य व केंद्र सरकारला अहवाल देतील, असे मंत्री सामंत म्हणाले.

SL/ML/SL

10 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *