वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ वकिल संघटनेचे आंदोलन

मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत त्या थांबाव्यात व अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील राजाराम आढाव (५२) व मनीषा आढाव (४२) या वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील शहर सत्र व दिवाणी न्यायालयातील वकिलांच्या संघटनेने शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन केले.
वकील संरक्षण कायद्याच्या मागणीचे सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आहे. याबाबत राज्य सरकारकडून ठोस उपाय योजना होत नाही. आता जर मागणी मान्य केली नाही तर हा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जाण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
वकील संरक्षण कायद्याची मागणी खूप जुनी आहे. वारंवार वकिलांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. आता दोन वकिलांची हत्या झाली आहे. अनेक ठिकाणी वकिलांना मारहाण झाली आहे. असे संघटनेचे अध्यक्ष ॲड. रवी जाधव यांनी सांगितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यभर न्यायालयात काम बंद आंदोलन झाले. आझाद मैदानात आंदोलन दरम्यान वकिलांनी तीव्र घोषणा दिल्या.
SW/KA/SL
2 Feb. 2024