‘परीक्षा पे चर्चा’ संवादातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले तणावमुक्तीचे धडे

 ‘परीक्षा पे चर्चा’ संवादातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले तणावमुक्तीचे धडे

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी- बारावी  या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. दरवर्षी प्रमाणे आज नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी देशभरातीली विविध भागातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. त्याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, याचा कानमंत्र दिला. परीक्षेचा ताण घेऊ नका. परीक्षा हा जीवनाचा जन्मजात भाग आहे. हे छोटे टप्पे आहेत. त्यांनी घाबरू नका. तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत आहात का? तुम्ही अनेकवेळा परीक्षी दिली आहे. अशा अनुभवांना तुमची ताकद बनवा. तुम्ही जे करत आहात, त्यावर विश्वास ठेवा, असे सांगत पंतप्रधानांनी मुलांच्या मनातील परिक्षेबाबतचे दडपण कमी केले.

सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मोदींनी मुलांच्या परीक्षा आणि आयुष्यातील ताणतणाव या प्रश्नांना उत्तरे दिली. परीक्षेत कुटुंबाच्या निराशेला कसे सामोरे जावे याविषयी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या.

घरात आईचे व्यवस्थापन, क्रिकेटची गुगली, पतंगाचा मांझा, संसदेत खासदारांची भांडणे अशी उदाहरणे देऊन पंतप्रधानांनी मुलांना समजावून सांगितले. एका विद्यार्थ्याने परीक्षेतील दबावावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘कौटुंबिक दबावाखाली येऊ नका. तुम्ही कधी क्रिकेट पाहायला गेला असाल, तर काही फलंदाज आले की, संपूर्ण स्टेडियम चौकार-चौकार, षटकार-षटकार असे ओरडू लागतात. प्रेक्षकांच्या मागणीनुसार तो चौकार-षटकार मारतो का? तर नाही. फलंदाजाचे लक्ष फक्त चेंडूवर असते. गोलंदाजाच्या मनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तो चेंडू जसा आहे तसा खेळतो.”

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर पंतप्रधानांनी दिलेले काही मौलिक सल्ले

  • केवळ परीक्षेतच नाही, तर आयुष्यातही वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. काम वेळेवर न झाल्याने उशीर होतो. काम करताना कधीही कंटाळा येत नाही. त्यातून समाधान मिळते.
  • अभ्यास करतानाही जेव्हा मन फ्रेश असेल तेव्हा कमी आवडीचा किंवा अवघड विषयाचा अभ्यास करा. त्यानंतर मग आवडता विषय घ्या. अशा प्रकारे तुम्हाला आराम मिळेल आणि तयारी देखील होईल.
  • मित्रांनो कॉपी कधीही करू नका. परीक्षा येतात आणि जातात, जीवन जिंकतच जगावे लागते.
  • जेव्हा तुम्ही तुमची क्षमता ओळखता. तेव्हा तुम्ही सर्वात शक्तिशाली बनता. ज्यांना स्वतःची क्षमता माहीत नसते, त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

SL/KA/SL

27 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *