गडचिरोलीत आदिवासींसाठी पुजारीच होणार ‘आरोग्यदूत’
गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली आरोग्य विभागाने एक अनोखी आणि प्रभावी उपाययोजना सुरू केली आहे. पुजाऱ्यांनाच आरोग्यदूत बनवून आदिवासी बांधवांना डॉक्टरांकडे पाठवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी पुजाऱ्यांना मानधनही दिलं जाणार आहे.
आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आणि मृत्यूदरही चिंताजनक ठरला. काही दिवसांपूर्वीच एका गर्भवती मातेने डॉक्टरकडे न जाता पुजाऱ्याकडे जाऊन उपचार केल्याने तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला होता. मात्र, आता या समस्येवर आरोग्य विभागाने ही नवी शक्कल लढवली आहे.
गावातील पुजाऱ्यांनाच प्रशासनाने आरोग्यदूत बनवले असून जे पुजारी पूर्वी पारंपरिक उपचार करायला सांगायचे, तेच पुजारी आता रुग्णांचे मतपरिवर्तन करुन तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.
जिल्ह्यातील जवळपास 1700 पुजाऱ्यांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एटापल्ली आणि भामरागड या दोन तालुक्यात हा प्रयोग राबवला जात आहे. पुजाऱ्यांना आरोग्यविषयक प्राथमिक प्रशिक्षणही दिले जात असून पुजाऱ्यांना प्रती रुग्ण 15 रुपये मानधनही दिले जाणार आहे.
SL/ML/SL