जलद विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या (FMCG) किंमती वाढणार
नवी दिल्ली,दि. ३ : युद्धामुळे देशातील इंधनाच्या किंमती वाढल्याने आणि इंधन पुरवठ्यावर मर्यादा आल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता साबणापासून तेलापर्यंत ग्राहकांच्या नेहमी वापरात असलेल्या जगद गतीने विकल्या जाणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीही वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
FMCG कंपन्या वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज फर्मने आपल्या एका रिपोर्टमध्ये तसा दावा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ तसेच जागतिक पातळीवर घसरलेला रुपया या दोन गोष्टींमुळे उत्पादनास लागणाऱ्या कच्च्या मालाचा आयात खर्च वाढला आहे. त्यामुळे अशा स्थितीत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत स्थिर ठेवणं कठीण होत आहे. त्यामुळेच कच्चा माल महागल्यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पहिल्या तिमाहीत किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढू शकतात.
वित्त वर्ष 2025-26 मध्ये एफएमसीजी कंपन्यांकडे असलेल्या कच्च्या मालाच्या साठ्यामुळे उत्पादन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु आता कच्चा माल कमी पडू लागल्याने तसेच कच्च्या मालाची किंमत वाढल्याने हा भाववाढीचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय प्रत्यक्षात घेण्यात आला तर FMCG कंपन्यांकडून तयार केले जाणारे शाम्पू, तेल, बिस्कीट आदी उत्पादनांची किंमत वाढू शकते.
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प पडली असून भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी कच्चा माल कमी पडत आहे. याच फटका आता FMCG वस्तूंनाही बसणार आहे.
FMCG म्हणजे अशा दैनंदिन वापराच्या वस्तू, ज्या ग्राहकांकडून अत्यंत वेगाने आणि वारंवार खरेदी केल्या जातात. या वस्तूंची किंमत कमी असते, मागणी खूप जास्त असते आणि त्या लवकर खराब होणाऱ्या (नाशवंत) किंवा कमी शेल्फ लाइफ असलेल्या असतात. उदाहरणे: टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, बिस्किटे, शीतपेये, साफसफाईचे साहित्य (Detergents), आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थ
SL/ML/SL