मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई, दि १४: मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंबेडकरांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे.
आंबेडकरांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारवर जातीय शुद्धीकरण, सत्य दडपणे आणि न्यायाकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर आरोप केले. त्यांनी माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ख्रिश्चन कुकी समाजावर अन्याय केल्याचे सांगितले. तसेच लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न :
१) जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग सरकारने ख्रिश्चन कुकी समाजाचे जातीय शुद्धीकरण का केले?
२) कुकी समाजाची घरे जाळली जात असताना, महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान गप्प का राहिले?
३) हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ते इतर राज्यांमध्ये प्रचारात व्यस्त का होते?
४) सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास मोदी सरकार नकार का देते?
५) आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात?
आंबेडकरांनी या प्रश्नांच्या माध्यमातून मोदी सरकारची नैतिकता आणि मणिपूरच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सरकारकडून या घटनांबाबत ठोस उत्तर आणि कारवाईची मागणी केली आहे.KK/ML/MS