मंत्रालयाच्या गेटवर प्रहारचे आंदोलन

मुंबई, दि 11 – शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसापासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू अन्नत्याग उपोषण आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यालयाच्या गार्डन गेटवर आंदोलन केले. यावेळी पोलिसांची बरीच धावपळ झाली.अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करीत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
राज्यातील शेतकरी, दिव्यांग, कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी माजी आमदार, माजी माजी राज्यमंत्री बच्चू कडू गुरूकुंज मोझरी येथे गेल्या चार दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहेत. त्यांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधावे या करीता त्यांच्या समर्थनार्थ आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर गार्डन गेटवर आंदोलन केलं या आंदोलनात अनेक दिव्यांग कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बरीच धरपकड झाली आहे. काही कार्यकर्ते अचानकपणे गार्डन गेटवर जमा झाले आणि त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचीही एकच धांदल उडाली दरम्यान आंदोलन करण्याऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी गेल्या चार दिवसापासून आंदोलन आंदोलन सुरू केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरसकट लाडक्या बहिणींना महिना १५०० रूपये देण्याचे घोषित केलं आणि आता त्यासाठी नियम लावण्यात येत आहेत ही लाडक्या बहिणींनींची फसवणूक करण्यात आली आहे. असा आरोप करीत या प्रश्नावर सुद्धा बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन निवडणूकीपुर्वी महायुती सरकारने दिले होते त्याचे काय झाले त्यावर सुद्धा बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिव्यांगाचे प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडक्या बहिणींची फसवणूक आदी प्रश्नावर गुरूकूंज मोझरी येथे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं आहे. त्यावर आता सरकार काय भूमिका घेईल हे पाहवं लागणार आहे.