वर्षा बंगल्यावर धडक मारणाऱ्या बार्टीच्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

 वर्षा बंगल्यावर धडक मारणाऱ्या बार्टीच्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क) : अजून किती वर्ष सरकारच्या आश्वासनावर जगत राहायचे ? आता सहन होत नाही व सांगताही येत नाही. आता आर या पार ची लढाई करायची असे ठरवत आक्रमक झालेल्या आझाद मैदानातील बार्टीच्या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर धडक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आझाद मैदान गेटवर सर्व ताकद लावत या विद्यार्थ्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

बार्टीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन फेलोशिपसाठी आझाद मैदानात अनेक महिन्यांपासून बेमुदत उपोषण सुरू केले असताना मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर धाव घेतली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मैदानाचे सर्व दरवाजे बंद केले. त्यावर संतापलेल्या उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आझाद मैदान दणाणून सोडले.

संशोधन फेलोशिपसाठी गेल्या दोन महिन्यापासून बार्टीचे संशोधन विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलने, उपोषणे करीत आहेत. सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
जोरदार घोषणाबाजी करत उपोषणकर्त्यांनी मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत धाव घेतली.
अचानक काढलेल्या मोर्चामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी मैदानाची सर्व प्रवेशद्वारे बंद करून उपोषणकर्त्याना रोखून धरले. त्यामुळे उपोषणकर्ते अधिकच संतापले.

बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मैदानाच्या दरवाजावर चढून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि उपोषणकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी अटकाव केल्यामुळे दरवाजावरच ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देत उपोषणकर्त्याना आझाद मैदान दणाणून सोडले. यावेळी काही काळासाठी आझाद मैदानात तणाव निर्माण झाला होता.

SW/KA/SL

6 Feb/2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *