मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी ‘आठवले’ घराण्याचा कवी

मुंबई, दि. २१ : मुंबईत रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात सात रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला खरं सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र यांनी कविता सादर केली.
फडणवीसांनी सादर केलेली कविता
तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो
नसे ना का अर्थ, अनर्थ तर नसतो
अरे तुम्ही काय कविता कराल
पण, आणि, किंवा, परंतु,
अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे
कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरुन गेली पाहिजे