‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी घेतली जुन्नरमधील शेतकऱ्याच्या कामाची दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२३व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात जुन्नरमधील शेतकरी रमेश खरमाळे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा आठवड्याच्या अखेरीस लोक आराम करणे पसंत करतात, तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंब कुदळ-फावडे घेऊन डोंगरांवर जातात. ते जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर खोदतात, बिया लावतात. फक्त दोन महिन्यांत त्यांनी ७० चर खोदले आहेत, शेकडो झाडे लावली आहेत. ते एक ऑक्सिजन पार्कही उभारत आहेत. यामुळे पक्षी आणि वन्यजीव परत येत आहेत.”
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे रहिवासी रमेश खरमाळे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत. एकेकाळी भारतीय सैन्यात शौर्याने सेवा करणारे रमेश खरमाळे आज वनरक्षक म्हणून पर्यावरण रक्षणासाठी आपल्या कुटुंबासह अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतली, हे त्यांच्या कार्याच्या व्यापकतेचे प्रतीक आहे.
रमेश खरमाळे हे एक सेवानिवृत्त सैनिक असून त्यांनी सुमारे १७ वर्षे भारतीय सैन्यात देशसेवा केली आहे. २०१२ मध्ये निवृत्तीनंतर काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली. मात्र ही नोकरी त्यांच्या मनासारखी नव्हती. देशसेवेची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तळमळ त्यांच्या मनात सतत होत होती.
त्यामुळे त्यांनी तरुणांसाठी सैनिकी प्रशिक्षण अकादमी सुरू केली. या अकादमी मार्फत अनेक तरुणांना त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी मदत केली. परंतु, त्यांना आपली खरी ओढ निसर्ग, पर्यावरण आणि सामाजिक सेवेच्या दिशेने असल्याची जाणीव झाली. त्यांनी वन विभागाची परीक्षा दिली आणि वनरक्षक म्हणून आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली.