विद्यार्थ्यांनी घेतला गाव प्लास्टिकबॅग मुक्तीचा ध्यास !

यवतमाळ, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजची भीषण समस्या म्हणजे वाढते प्रदुषण, या प्रदुषणाला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात एक प्रमुख म्हणजे कॅरीबॅगचा अर्थात प्लास्टिक पन्नीचा बेसुमार वापर. भाजी आणणे असो की किराणा आणणे असो , अनेक जण प्लास्टिक पन्नीतच या वस्तू आणतात, ती घरात आणली की साहजिकच ती कॅरीबॅग घराबाहेर फेकून दिली जाते. अशा फेकलेल्या पन्न्या आज जागोजागी विखुरलेल्या दिसतात. शहरात असो की गावात आता प्लास्टिक पन्नीचा बेसुमार वापर सर्वसामान्य झाला आहे. विशेष म्हणजे यातील सिंगल यूज प्लास्टिक पन्नीव वापरावर बंदी आहे. परंतु या बंदिला न जुमानता लोक बिनधास्त वापर करतात. परिणामी रस्त्याच्या कडेला , अथवा उकीरडयावर प्लास्टिक पन्नीचा ढिग आपल्याला दिसून येतो.यामुळे नदी नाल्यातून वाहून जाणारे पाणी थांबते , जमिनीत मुरत नाही.परिणामी प्रदुषणात वाढ होते. शिवाय प्लास्टिक पन्नीमधील पदार्थ खाल्ल्याने कर्करोगासारखा आजार उदभवतो हे माहीत असुनही अनेक जन प्लास्टिक पन्नीतुन पालेभाज्या, फळ , दूध अथवा अन्य खाद्य पदार्थ आणतच असतात. राज्य शासनाच्या माझी शाळा मुख्यमंत्री शाळा या उपक्रमा अंतर्गत यवतमाळ तालुक्यातील भारी गावातील जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी प्रदुषणाचा काळ ठरलेल्या प्लास्टिक पन्नीचे गावातून उच्चाटन झाले पाहिजे असा ध्यास घेतला आणि गाव प्लास्टिक पन्नीमुक्त केले.पूर्वी शहरात असलेली ही समस्या गावखेडयात सुध्दा पोहचली आहे. भारी हे तस जेमतेम 1200 लोकसंख्येचे गाव परंतू येथे सुध्दा प्लॅस्टीकने थैमान घातले आहे. गावातील कोणताही कोपरा बघा किंवा रस्ता बघा कॅरीबॅग दिसून येतातच येतात. त्यामुळे या भीषण समस्येतून मुक्त होण्याचा निर्धार या शाळेच्या विद्यार्थ्यानी घेतला. यासाठी सर्वप्रथम विद्यार्थी तथा शिक्षकांनी जनजागृती फेरी काढली. यवेळी विविध समर्पक म्हणी लिहीलेली फलकं विद्याथ्र्यांनी हातात घेतली होती. यानंतर विद्यार्थ्यानी गावात फिरून संपूर्ण प्लास्टिक पन्नी गोळा केल्या. गोळा झालेल्या प्लास्टिक पन्नी ग्रामपंचायतच्या स्वाधीन केल्या. याचवेळी लोकांना कापडी पिशव्यांची सवय लागली पाहिजे म्हणून शाळेच्या वतीने खास कापडी पिशवी वाटण्याचाही उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी घरोघरी जाउन कापडी पिशव्या दिल्या, तसेच प्लॅस्टीक पन्नी वापराचे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगीतले.यानंतर जे काही आणायचे असेल ते कापडी पिशवीतच आणावे असा सल्लाही दिला. यामुळे आजतरी भारी गाव कॅरी बॅग मुक्त झाले आहे. यापुढे गावकरी पिशवीतच पालेभाज्या, फळ, फळावळ अन्य वस्तू आणतील अशी अपेक्षा करुया.
ML/KA/PGB 20 Feb 2024