खासदार पीयूष गोयल यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २२ : केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात रविवारी ९२ प्रकरणांचा निपटारा करण्यात याला. यात महापालिका, म्हाडा, गृहनिर्माण संस्थांपासून ते थेट पोलिस ठाण्यात दखल घेतली जात नसल्याच्या प्रकरणांचा समावेश होता.
खासदार पीयूष गोयल हे कांदिवली येथील त्यांच्या लोककल्याण कार्यालयात नियमित जनता दरबार भरवून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश देत असतात. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमध्येही तक्रारअर्ज आणि निवेदन देण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी अनेक प्रकरणात तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश पीयूष गोयल यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले. या अर्जांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना न मिळालेली नुकसानभरपाई अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. त्याचप्रमाणे अनेक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या मागण्या आणि तक्रारी पीयूष गोयल यांना सादर केल्या.
यावेळी मालाड पुर्व येथे राहणाऱ्या रिना वर्मा या घरकाम करणाऱ्या महिलेनेही घरगुती हिंसचाराबाबत तक्रार करूनही पोलिस त्याची दखल घेत नसल्याचे निवेदन पीयूष गोयल यांना सदर केले. गेल्या सात वर्षांपासून पती आपला शारीरिक आणि मानसिक छळ करतो. कामावर जाऊ नये यासाठी घराचा दरवाजा बाहेरून बंद करतो. याबाबत अनेकदा पोलिस ठाण्यात तक्रार करूनही आजवर कोणतीच कारवाई झाले नसल्याचे त्यात नमुद केले आहे. गोयल यांनी याबाबत दखल घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यावेळी मागील जनता दरबारात दाखल झालेल्या तक्रार अर्जांचाही पाठपुरावा करण्यात आला.
लोककल्याण कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाते आणि म्हाडा, एसआरए, महापालिका अशा सर्व विभागांशी संपर्क ठेवून त्यावर निर्णय घेतले जातात. याचा परिणाम म्हणून लवकरच उत्तर मुंबईत प्रगतीची लाट उसळेल, अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. KK/ML/MS