फुलशेती मधून दरवळला आत्मनिर्भरतेचा सुगंध !
यवतमाळ दि. २९ (आनंद कसंबे ) : केल्याने होते आहेरे आधी केलेची पाहिजे, या म्हणीची पुन्हा प्रचिती येते जेव्हा आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील तरुण शेतकरी अमोल घाटे यांचा फुलशेतीचा प्रयोग पाहू.
अमोल घाटे यांचा व्यवसाय फुल, फुलमाळा तथा पुष्पगुच्छ विक्रीचा. यासाठी ते बाहेरुन फुले विकत आणायचे. साहजिकच यात त्यांचे बरेच पैसे खर्च व्हायचे. वाट पाहण्यातही वेळ जायचा .
नंतर मात्र त्यांनी स्वतः शेती विकत घेतली आणि आपल्या शेतात फुलशेतीचा प्रयोग केला. यामध्ये अमोलने, पिवळा झेंडू, केसरी झेंडू, गुलाब, गलांडा, निशिगंधा, लिली, शेवंती, बिजली इत्यादी फुल झाडांची लागवड केली. कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पाण्याची मात्रा, खताची मात्रा दिली आणि पाहता पाहता अमोल चे शेत रंगीबेरंगी फुलांनी बहरून आले. आजघडीला अमोल आपल्या शेतामधे मजुर लावुन फुलांची तोडणी करतात.
आज अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम असतात, लग्न समारंभ असतात, अथवा कोणता सण उत्सव असतो, फुलांची मागणी वाढत आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने पारंपारिक कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना फाटा दिला आणि आपल्या शेतात फुलशेतीचा प्रयोग सुरू केला. तंत्रशुध्द पध्दतीने फुलझाडांची लागवड केली. तुषार सिंचन पध्दतीने पाणी दिले. परिणामी संपुर्ण शेत नयनरम्य रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांनी बहरुन आले. आपल्याच शेतातील फुलांपासुन अमोल फुलमाळा तथा पुष्पगुच्छ तयार करतात. लग्न समारंभ असो अथवा कुणाचा सत्कार सोहळा असो, अमोल संबंधीत कार्यक्रमाचे फुल सजावटीचेही काम करतात. साहजिकच नफ्याचे प्रमाण वाढले. यातून अमोलला महिन्याकाठी तब्बल एक लाख पेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागले.
अमोल घाटे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत एक आगळावेगळा फुलशेतीचा प्रयोग केला आहे.यात ते यशस्वी झाले म्हणुनच त्यांच्या फुल शेतीच्या प्रयोगातून आज त्यांच्या परिवारात आत्मनिर्भरतीचा सुगंध दरवळला आहे अस म्हटल्यास चूक ठरु नये.ML/ML/MS