PETA चा अजब दावा, म्हणे कबुतरं पण मुंबईकरच

मुंबई, दि. ८ : कबुतरांच्या अती संख्येमुळे मुंबईकरांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय म्हणून मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात प्राणिहक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या स्वयंसेवी संस्थेने मोहीम उघडली आहे. कबुतरखान्यांजवळ संस्थेने मोठे फलक उभारून मुंबईतील कबुतरे हीसुध्दा मुंबईकरच आहे, असा संदेश या फलकांवर लिहिला आहे.
नुकतीच मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना हटवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. कबुतरखान्याजवळ फलक उभारून कबुतरांना दाणे देऊ नका, असे आवाहन केले जात आहे. तिथेच पेटाने फलक उभारला आहे. या फलकावर नवजात पिल्लांसोबत मादी कबुतराचे छायाचित्र आहे. या फलकाच्या माध्यमातून मुंबईतील भटक्या कुत्र्या-मांजरांप्रमाणेच कबुतरांनासुध्दा जगण्याचा हक्क आहे. त्यांना जगू द्या, असा संदेश देण्याचा प्रयत्न पेटाने केला आहे.
पेटाचा असा दावा आहे की, कबुतरांच्या विष्ठेपासून माणसांना होणाऱ्या संसर्गासंबंधी अहवालांचा सखोल अभ्यास केला असता कबुतरे माणसांसाठी धोकादायक नाहीत हे स्पष्ट होते. जे लोक कबुतरांच्या रोज संपर्कात असतात त्यांनादेखील कबुतरांपासून बर्ड फ्ल्यूसारख्या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे.(Mumbaikar pigeons)
SL/ML/SL