महाराष्ट्र सरकारने सरन्यायाधीशांना दिला “कायमस्वरूपी पाहुणे” दर्जा

मुंबई, दि. २१ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सामान्य प्रशासकीय विभागाने आज एक विशेष परिपत्रक जारी करत सरन्यायाधीश भूषण गवई यांना विशेष पाहुणे दर्जा प्रदान केला आहे. या परिपत्रकात सर न्यायाधीशांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्य सचिव, डीजीपी किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. सरन्यायाधीशांची महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये, जिथे भेटी नियोजित आहेत तिथे वरिष्ठ जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच १४ मे रोजी मुंबईत भेट दिली होती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी राज्यातील कोणीही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते. याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता सर न्यायाधीश गवई यांना आज शासनाने विशेष पाहुणे दर्जा बहाल केला आहे.
१४ मे रोजी महाराष्ट्रातील त्यांच्या गृहराज्यात सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या भेटीत, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली.