फळमाशीमुळे होणाऱ्या फळ आणि पीक नाशावर संशोधन कार्यशाळा

नवी मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून विकसनशील देशांना शेती आणि शेतकरी यांना जपणे गरजेचे असल्याचं मत केंद्रीय शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज नवी मुंबईत व्यक्त केलं.
आंबा फळावर होणा-या फळ माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच त्यावर संशोधन होण्यासाठी आशिया आणि पॅसिफिक पीक संरक्षण अर्थात एपीपीपीसी यांच्यावतीने पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे तिच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नवी मुंबईतल्या वाशी इथं होत असलेल्या या परिषदेत २५ देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले आहेत.
फळ माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने फळे, भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा पर्याय आहे.
निर्यात करूनच आपले उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे केवळ कीड नियंत्रणच नव्हे खतांचा कमी वापर यावरही सरकारचे लक्ष आहे यातूनच आपले उत्पन्न वाढणार आहे असे मंत्री म्हणाल्या.
भारत नेहमीच वसुधैव कुटुंबकम वाक्याचा जयघोष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी चर्चा व्हावी. पायभूत सुविधा, निर्यातीवर लक्ष केंद्रित करून शेती व्हावी यासाठी काय करू शकतो यावर विचार व्हावा. सहभागी २५ देशांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करावे, त्यासाठी काय करता येईल याबाबत विचार करावा असं आवाहनही शोभा करंदलाजे यांनी केलं.
यंदाच्या वर्षी जगभरात चार लाख रुपयांची निर्यात केली आहे. देशातील ४५ टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होत आहे. १ हजार २०० याच्या जाती आहेत. त्यापैकी ३० ते ३५ आंबा व्यावसायिक आहेत त्यापैकी १२ जातींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. चारशे कोटी रुपयांचा आंबा निर्यात करतो. तर ८०० कोटींच्या आसपास आंबा पल्पची विक्री केली जाते. आंब्याची १ हजार कोटींची उत्पादने बनवली जातात. त्यामुळे फळ माशीबाबत संशोधन होणे आवश्यक असल्याचं मत अपेडा चे संचालक तरूण बजाज यांनी यावेळी व्यक्त केलं.
ML/KA/SL
19 June 2023