पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवसात जिंकली तब्बल ८ पदकं, सुवर्णपदकही मिळालं

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरीसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पाचव्या दिवशी भारताने एकाच दिवसात तब्बल ८ पदकं जिंकली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवला. सोमवार, २ सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण ८ पदकं जिंकली आहेत. याआधी पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने एकाच दिवसात इतकी पदकं जिंकली नव्हती. यासह भारताच्या खात्यात आता एकूण १५ पदकं झाली आहेत. त्यामुळे भारताला पदकतालिकेत फायदा झाला. पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदकतालिकेत भारत आता १५व्या स्थानावर आहे. ५व्या दिवसाचे सामने सुरू होण्यापूर्वी भारताच्या खात्यात ७ पदकं होती आणि देश २७व्या स्थानावर होते. भारताने आतापर्यंत एकूण ३ सुवर्णपदकं पटकावली आहेत, जी नेमबाजी, पॅरा बॅडमिंटन आणि भालाफेकमध्ये मिळवली आहेत.
भारताला तिसरं सुवर्णपदक सुमीत अंतिलने जिंकून दिलं. त्याने पुरुषांच्या F64 भालाफेक स्पर्धेत हे सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन हिने कांस्य पदक जिंकले आहे. महिलांच्या सिंगल SH6 इव्हेंटमध्ये नित्याने इंडोनेशियाच्या रिना मार्लिना हिचा पराभव केला आहे. तसेच शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी तिरंदाजीत कांस्यपदक नावावर केले. तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले.
TR/ML/PGB 3 Sep 2024