बहारदार गायनाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सुरुवात

 बहारदार गायनाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सुरुवात

पुणे प्रतिनिधी– स्वर्गीय सूर, तबल्याचा ठेका, टाळांचा निनाद आणि हार्मोनियमच्या मंजुळ साथीत भारावलेल्या वातावरणात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा बहारदार शुभारंभ झाला.

आपला परिसर आणि तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा प्रारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महोत्सवाचे संयोजक माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी, बढेकर ग्रुपचे प्रमुख प्रवीण बढेकर, गोवा राज्याचे माजी मंत्री विनोद पालेकर, पूर्वा केसकर, ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, रवींद्र खरे, महेश पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.

संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका शैला दातार यांना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर जयंत केजकर यांना ‘प्रथितयश पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना शैला दातार म्हणाल्या, “पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्या संगीत साधनेचा मोठा सन्मान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि विविध ठिकाणी सादरीकरणाची संधी लाभली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतच आम्ही या क्षेत्रात वाटचाल करत आहोत.”

उज्वल केसकर यांनी सांगितले की, “आपला परिसर आणि तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचा २४ वर्षांचा स्नेहबंध आहे. या कालावधीत ७०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पं. शौनक अभिषेकी यांच्या पुढाकारामुळे देशातील नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत. कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच हा महोत्सव गेली २० वर्षे यशस्वीपणे सुरू आहे.”

महोत्सवाच्या प्रारंभी गायक राजयोग धुरी, अंजली गायकवाड, विश्वजीत मिस्त्री आणि नंदिनी गायकवाड यांनी सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. नंदिनी गायकवाड यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘मत्स्यगंधा’ या संगीत नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे पद सादर करत मैफलीची सुरेख सुरुवात केली. त्यानंतर ‘कधीतरी कोठेतरी’ या नाटकातील ‘धन्य धन्य शंखराज’ आणि ‘गगनावरी घुमती नाद’ ही पदे सादर झाली.

अंजली गायकवाड यांनी ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकातील ‘आज सुगंध आला लहरत’ हे पद सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच ‘काटा रुते कुणाला, मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे’ हे भावपूर्ण गीत सादर करत त्यांनी रसिकांना संगीत नाटकांच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.

वादक कलाकार उदय कुलकर्णी (ऑर्गन), सुगात कोरगावकर (हार्मोनियम), रामकृष्ण करंबळेकर (तबला), ज्ञानेश्वर दूधाने (पखवाज) आणि शिरीष जोशी (टाळ) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. या सर्व कलाकारांचा महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभानंतर महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर यांनी गेली वीस वर्षे हा स्वरयज्ञ अखंडपणे सुरू ठेवला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. पुण्यातील जाणकार आणि अभ्यासू रसिकांसमोर सातत्याने कार्यक्रम सादर करणे हे आयोजकांसाठी मोठे आव्हान असते. अशा रसिकांसमोर वीस वर्षे दर्जेदार कार्यक्रम सादर करणे हे आयोजकांचे मोठे यश आहे.”

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *