पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी
कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे . धोका पातळी 43 फूट इतकी आहे. सकाळी सात वाजेपर्यंत 39 फूट चार इंच इतकी पंचगंगेची पाणी पातळी होती.
पाणी पातळीत सतत वाढ सुरू असल्यानं संभाव्य महापुराच्या धोक्यानं शहरातील तसेच ग्रामीण भागातील पूरप्रवण भागातील नागरिक आणि जनावरांचं स्थलांतर सुरू झालं आहे. व्यापाऱ्यानीही साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 82 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
पुराचं पाणी आल्यामुळे शहरातील शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
एसटीची नऊ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग 11, ग्रामीण मार्ग 14 अशा 25 मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याशिवाय सहा राज्य मार्गही पाण्याखाली गेले आहेत.पन्हाळा, कोल्हापूर- चंदगड, कोल्हापूर-गारगोटी, गडहिंग्लज यांच्यासह
कोल्हापूर – गगनबावडा वाहतूक बंद आहे.
शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पन्हाळा शाहूवाडी राधानगरी गगनबावडा भुदरगड आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गोठे आकुर्डी, तांदुळवाडी, पणुत्रे, निवाचीवाडी, गवशी, हारपवळे या धामणी खोऱ्यातील गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचं स्वरूप आलं आहे.
ML/KA/SL
24 July 2023