माऊलींच्या पालखीने ठेवले पंढरीच्या दिशेने प्रस्थान…

पुणे दि ११– विठ्ठल दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी राज्यभरातून आळंदीत दाखल झाले आणि त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका असलेली पालखी घेऊन पंढरीच्या दिशेने आज प्रस्थान ठेवले आहे. वारकऱ्यांचे आगमन आणि ‘ज्ञानोबा- माउली’च्या जयघोषाने गेल्या चार दिवसांपासून अवघी अलंकापुरी दुमदुमली आहे. माउलींच्या पालखीचे प्रस्थान देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवले गेले.सध्याच्या उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी प्रस्थान सोहळा मर्यादित वेळेत करण्याचा संस्थानचा मानस होता, मात्र ते शक्य झाले नाही. दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करणे, खांदेकरी नियंत्रित संख्या, मंदिरात कमीत कमी लोकांना प्रवेश याबाबत वेळोवेळी बैठका घेत निर्णय घेण्यात आला. आज मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश दिला गेला. त्यानंतर माउलींच्या अश्वांचे मंदिरात आगमन झाले….. सायंकाळी सहाच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी समाधी मंदिरातून बाहेर पडली , पालखीची मंदिर प्रदक्षिणा घालून मग तिने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. उद्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या दोन्ही पालख्यांचे एकत्रित आगमन हे पुणे शहरात होणार आहे. आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा पहिला विसावा हा पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज माऊलींच्या आळंदी येथील आजोळी असणार आहे.
ML/KA/PGB 6 Jun 2023