पाकच्या नेत्याने भारताला दिली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

इस्लामाबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानची पूर्ण नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकच्या नागरिकांना तातडीने परत पाठवले जात आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा अरेरावीची भाषा सुरु केली आहे. काल पाकच्या पंतप्रधानांनी निष्पक्ष चौकशीक पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले होते त्याला चौविस तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली.
ते म्हणाले, आम्ही भारतासाठी शाहीन, घोरी आणि गझनवी सारखी १३० क्षेपणास्त्रे ठेवली आहेत. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर आम्ही त्यांचा श्वास रोखू. भारताने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवलेली नाही, तर आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली आहेत. आमची क्षेपणास्त्रे भारताकडे लक्ष्यित आहेत. भारताला हे देखील माहित आहे की आमच्याकडे शस्त्रे आहेत, म्हणूनच ते आमच्यावर हल्ला करत नाहीत.
या समस्या सोडवण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत. अब्बासी म्हणाले की, भारत आपल्या सुरक्षेतील त्रुटी मान्य करण्याऐवजी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देत आहे. इस्लामाबाद त्याच्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही आर्थिक कारवाईला तोंड देण्यास तयार आहे.
पाकिस्तानला पाणीपुरवठा थांबवण्याच्या आणि व्यापारी संबंध तोडण्याच्या भारताच्या निर्णयाची हनीफ अब्बासी यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे, भारताचा विमान वाहतूक उद्योग अवघ्या दोन दिवसांत अडचणीत आला. भारताला आपली चूक कळली आहे. जर आम्ही १० दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवले तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील.
दरम्यान पाकिस्तानसोबतचा ‘सिंधू पाणी करार पुढे ढकलण्या’बाबत शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाची बैठक झाली. ते ३ टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील म्हणाले की, याबाबत तीन प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.