जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

संभाजीनगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील अनेक मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांच्या यादीत अजिंठा – वेरूळ चित्रपट महोत्सवाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी केली आहे.
पद्मपाणी पुरस्काराच्या निमित्ताने जावेद अख्तर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रुपये असा सन्मान मिळणार आहे.

बुधवार, दि. ०३ ते रविवार, दि. ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने श्रीयुत अख्तर यांच्या नावाची निवड केली असून या समितीत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, बेंगळुरू, ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर (मुंबई), प्रसिद्ध हिंदी कवी अशोक बाजपेयी (दिल्ली), फेस्टीव्हल डायरेक्टर अशोक राणे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता.
ML/KA/SL
9 Dec. 2023