संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू ?

 संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू ?

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का? असा सवाल संघाला विचारता आणि पीएफआयवरील बंदीचे समर्थन करण्यास तयार नाही? संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी करीत आज पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जागर मुंबईचा अभियानांतर्गत २२ वी जाहीर सभा अंधेरी पश्चिम विधानसभेत प्रगती मैदान येथे शनिवारी पार पडली. या सभेला मुंबई भाजपा प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. अमित साटम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी आणली. पीएफआय ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका दिला. सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानशी ज्यांचे लागेबंधे आहेत. त्या पीएफआयवर अमित शहा नावाच्या धाडसी गृहमंत्र्यांनी छापे टाकले. १०६ लोक पहिल्या दिवशी आणि २२७ लोकांना दुसऱ्या दिवशी अटक करून त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घातली. पीएफआयवरच्या बंदीचेही स्वागत करायला उद्धव ठाकरे तयार नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गोष्ट आली की, संघाची टोपी काळी का ? संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता का? संघाने संयुक्त महाराष्ट्रमध्ये फुट का टाकली? संघ भारतमुक्त का होऊ नये ही भाषणे उद्धव ठाकरे यांची आहेत. संघावर बंदी उपस्थित करता मग पीएफआय राष्ट्र भक्त आहे का? पीएफआयने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का? मग त्या पीएफआयच्या विरोधात तुम्ही का नाही बोललात? असाही सवाल त्यांनी केला.

मतासाठी मराठी – मुस्लिम तुष्टीकरण

असुरांचा नाश करण्यासाठी हा जागर आहे. हा जागर सत्तेसाठी नाही. समाजात तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही एक भारत श्रेष्ठ भारत मानणारे आहोत. पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम सुरू केला. २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले.

आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक टेंडरमध्ये पैसे खाण्याचे काम केले. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही.

मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ML/KA/SL

4 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *