सरन्यायाधीश गवईंच्या प्रथम मुंबई भेटीत अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉलचा भंग

मुंबई, दि. १८ : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज मुंबई भेटीत प्रशासनाच्या प्रोटोकॉल पाळण्यात आलेल्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असा शिष्टाचार असतो. मात्र, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अनुपस्थितीमुळे सरन्यायाधीशांनी नाराजी दर्शवली.
संविधानिक प्रतिष्ठेचा प्रश्न
सरन्यायाधीशांच्या मते, प्रोटोकॉल केवळ औपचारिकता नसून, संविधानिक संस्थांमधील परस्पर सन्मानाचा प्रतीक आहे. त्यांच्या स्वागतासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित असणे आवश्यक होते. न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला योग्य आदर न मिळाल्यास, शासनसंस्था आणि लोकशाही मूल्यांविषयी गंभीर प्रश्न निर्माण होतात.
या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सरन्यायाधीशांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. प्रशासनाने प्रोटोकॉलच्या त्रुटी भविष्यात टाळण्यासाठी अधिक सतर्क राहण्याचे आश्वासन दिले.
सामाजिक न्याय आणि प्रेरणादायी प्रवास या दौर्यात सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख केला. साध्या कुटुंबातून आलेल्या एका व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेपर्यंतचा प्रवास कसा केला, यावर त्यांनी प्रकाश टाकला. संविधानाने दिलेले समान संधीचे तत्त्व त्यांच्या प्रवासात महत्त्वाचे ठरले, असे त्यांनी स्पष्ट केले.