आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना ५ लाखांपर्यत मिळणार मोफत उपचार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नुकताच आदेश जारी केला आहे. त्यानुसार शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्याची कार्यवाही चालू करावी, असा आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नाधान्य वितरण अधिकारी तसेच उपनियंत्रक शिधावाटप मुंबईच्या विभागांना तशा सूचना दिल्या आहेत. या निर्णयाअंतर्गत आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. त्यामुळे आता रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.