आता घनकचऱ्यावर प्रक्रिया होणार कचऱ्याच्या गाडीतच
ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई , ठाणे यासारख्या मोठ्या महानगरातील कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले मात्र समस्या जागेवरच आहे. मोठ्या रहिवासी संकुलानी त्यांचा ओला कचरा त्यांच्याच जागेत प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी असा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र अनेक संकुलामध्ये जागाच मिळत नाही अथवा हे काम करणार कोण असा प्रश्न पडतो.
आता यावर हरित पर्याय उपलब्ध झाला आहे. साई खानोलकर या युवा उद्योजकाच्या लाहस् ग्रीन इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने Tow – Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go. या ‘टोगो’ वाहन तयार केले आहे. यात सुमारे तीन हजार घरांचा ओला कचरा जमा करून तो त्याचा गाडीत प्रक्रिया करून त्याचे रूपांतर खतात केले जाते.
ठाण्यातील ‘बिझनेस जत्रा’ या लघु उद्योजकांच्या मेळाव्यात ही गाडी प्रदर्शित करण्यात आली असून, ठाणे महापालिकेने त्यातील एक खरेदी केली आहे. आणखी काही महापालिकांनी देखील त्याचे प्रात्यक्षिक बघून त्याला पसंती दर्शिवली आहे. या पर्यायामुळे घनकचरा निर्मुलन ऑन द स्पॉट होऊन खतनिर्मितीही होणार आहे.अ,सा दावा लाहस् चे साई खानोलकर यांनी केला आहे.
पहिल्या टप्यात ही वाहने ठामपा आणि मिरा भाईंदर क्षेत्रात उपयोगात आणली जाणार आहेत. नागरीकरण वाढत असल्याने कचऱ्याची समस्या ही वाढत आहे, वारंवार जनजागृती करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिका प्रशासन मेटाकुटीला आले आहे. डंपिंग ग्राऊंडची वानवा असल्याने कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चालला आहे. यावर आता टोगो वाहनाचा हरित पर्याय उपयोगी ठरू शकतो.
ML/KA/SL
2 Dec. 2023