आता वाहन चालकांची मद्यासोबत ड्रग चाचणीही

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून तपासण्यात येणाऱ्या मद्याच्या अंशासोबतच चालकाने ड्रग सेवन केलं आहे की नाही याबद्दलची तपासणी देखील सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भातील प्रश्न काशिनाथ दाते यांनी उपस्थित केला होता, त्यावर योगेश सागर, गोपीनाथ पडळकर, अभिमन्यू पवार, नितीन राऊत आदींनी उपप्रश्न विचारले .
चुकीच्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या चालकांना रोखण्यासाठी देखील विशेष तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढे चुकीच्या पद्धतीने वाहन चालणाऱ्यानाही इशारा दिला जाईल त्यामुळे अपघात टाळतील असेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.
वाहन चालकांना परवाना देण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून परीक्षा घेतली जात आहे. त्यात सध्या वाहन परवाना मिळालेले 70 टक्के लोक अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे ही नवीन पद्धत सगळ्यांसाठी लागू करून वाहन परवाना दिला जाईल अशी माहिती देखील परिवहन मंत्री सरनाई यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली .
उंच इमारतींना सौर उर्जा योजना
मुंबई महानगरामध्ये असणाऱ्या उंच इमारतींच्या पाणी पंपाची आणि लिफ्टची विजेची बिले कमी करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून अशा सर्व इमारतींना सौर ऊर्जा योजना लागू करणे हा पर्याय उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या प्रश्नाचे उत्तरात दिली . मुरजी पटेल यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
ही योजना त्यांना लागू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.
आदिवासी भागात वीजपुरवठा
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि जळगाव या दुर्गम तालुक्यातील गाव आणि वस्ती वाड्याला पारंपरिक पद्धतीने वीस पुरवठा उपलब्ध करून दिला आहे त्या सर्वांना पुढील दोन वर्ष पारंपरिक पद्धतीने वीस पुरवठा केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली आमश्या पाडवी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.