लाडकी बहीण योजना – अपात्र महिलांकडून पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही!

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबाबत स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारचा उद्देश आहे महिलांचा सन्मान आणि स्वाभिमान अबाधित ठेवणे.
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने गेल्या वर्षी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं. आता सरकार आल्यावर हे २१०० रूपये कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. मात्र सध्या तरी महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्याचा हफ्ता येत्या 26 जानेवारीच्या आधी जमा होऊ शकतो. असे असले तरी, ज्या महिला या योजनेत बसत नाहीत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता आहे.
या अर्ज पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार का असा प्रश्न महिलांना पडला आहे. या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, मात्र शासनाने कुठलाही लाभ परत घेतलेला नाहीये. योजनेचं मुल्यमापन करणं यात नवीन काही नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.