कोणालाही बेघर करणार नाही
मुंबई,दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क ): जन हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज मुंबई महानगर पालिकेच्या गोवंडी येथील एम ( पूर्व ) कार्यालयावर झोपडपट्टीवासीयांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. झोपडपट्यांशी संबंधित अध्यादेश पुन्हा तपासून योग्य तो निर्णय घेऊ.कोणालाही बेघर करणार नाही.असं आश्वासन पालिका विभाग अधिकारी अलका ससाणे यांनी शिष्टमंडळाला दिलं. येत्या सोमवारी संयुक्त बैठक घेण्याचं त्यांनी मान्य केलं.
कुठल्या मागण्यांसाठी मोर्चा
झोपडपट्टीवासीयांना टॅक्स पावती देण्यात यावी.कट ऑफ डेटची पद्धत बंद करण्यात यावी तसेच येथील प्रस्तावित नाल्याच्या बांधकाम प्रकल्पामुळे कोणालाही बेघर करण्यात येऊ नये. पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक झोपडीधारकाला घर देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.अब्रार सुलेमानी,अजुमा बी.शेख, वंदना तायडे,जय मती,दुर्गा प्रसाद,गौतम मुकेश चोहान,नवीन यादव,मेशा आणि शुभम कोठारी यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर,जनता दल ( सेक्युलर ) चे राज्य महासचिव रवि भिलाणे,रिपब्लिकन सेनेचे खाजामिया पटेल,रिपाई नेते अशोक जाधव आदींनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
झोपडपट्टी वासीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या घर हक्क संघर्ष समिती आणि विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
SW/KA/SL
6 Feb. 2023