नितीश कुमार पुन्हा एन डी ए मध्ये सामील , नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

 नितीश कुमार पुन्हा एन डी ए मध्ये सामील , नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

पाटना, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारच्या राजकारणात आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली. तत्पूर्वी, नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. येथे नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी एनडीएसह सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं असून नितीश कुमारांनी आज सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथही घेण्याचा विक्रम नितीश कुमारांनी केला. शपथविधी कार्यकमानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नितीश कुमार म्हणाले “मी सुरुवातीपासून एनडीएबरोबर होतो. पण आम्ही आमचे मार्ग बदलले. परंतु, आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो असून यापुढेही एकत्रच राहणार आहोत”, असं नितीश कुमार म्हणाले. “आज आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काही मंत्री लवकरच शपथ घेतील. मी मुख्यमंत्री पदी शपथ घेतली असून माझ्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं आहे”.

“आम्ही बिहारच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी जिथं होतो तिथंच (NDA) परत आलो आहे. आता पुन्हा इथं-तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

नितीश यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडली आहे. भाजप बिहार विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. नितीश कुमार भाजपसोबत जात असल्यानं विरोधकांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. राजीनामा दिल्यानंतर नितीश मीडियाला म्हणाले- आम्ही राज्यपालांना विद्यमान सरकार बरखास्त करण्यास सांगितले. सर्व बाजूंनी मते येत होती. हे आम्ही ऐकले आहे. आता पूर्वीची युती सोडून नवी युती झाली आहे. आज आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो. आम्ही काम करत होतो, ते अजिबात काम करत नव्हते. लोकांना त्रास होत होता, आम्ही बोलणे बंद केले होते.

गेल्या काही दिवसांपासून राजदचे लालू यादव, तेजस्वी यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर नितीश कुमार यांनी पडद्यामागे भाजपशी बातचित सुरू केली होतं. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर नितीश यांनी मोदींचे आभार मानले आणि नितीश यांच्या नव्या चालीवर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यानुसारच आज नितीश यांनी राजीनामा दिला. नितीश कुमारांनी आतापर्यंत नऊवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पाचवेळा तर, दोन वर्षांत दोनवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.

SL/KA/SL

28 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *