नेमाडे म्हणतात, औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हताच

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इतिहासातील व्यक्तिमत्त्वांबाबत वादग्रस्त विधाने करत चर्चेृत राहण्याचा ट्रेंड सध्या राज्यभर सुरू आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना देखील हा मोह आवरता आलेला नाही. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना नेमाडे यांनी पेशव्यांसंबंधात अनुचित वक्तव्ये करत औरंगजेबाचे गोडवे गायले आहेत. सोशल मिडियावरून वाचक त्यांना टिकेला सामोरे जावे लागत आहे.
औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदू द्वेष्टा असं ठरवलं आहे. पण तो हिंदू द्वेष्टा नव्हता. त्याच्या दोन बायकांना काशीच्या पंड्यांनी भ्रष्ट केलं. त्यामुळे त्याने काशीचं मंदिर फोडलं. पुस्तकं, ग्रंथ वाचले की हे समजतं. आता नव्या पिढीने ज्ञान मिळवून इतिहास समजून घेतला पाहिजे असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच पेशवे हे अत्यंत नीच आणि दुष्ट होते असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवरायांचाही एकेरी उल्लेख केला आहे.
नेमाडे म्हणाले , “औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. तुम्हाला माहित आहे शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या आल्याच नाहीत परत. छावणीतले लोक म्हणाले की माहित नाही. मग औरंगजेबाला हे समजलं की तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं. पुस्तकं वाचूनच हे कळतं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटं असतं.” असंही नेमाडेंनी म्हटलं आहे.
SL/KA/SL
7 Aug